आदिवासी जनसंवाद यात्रेची जोरदार तयारी; नागपुरात पूर्वतयारी बैठक संपन्न, १३ एप्रिलपासून चिखलदरातून होणार भव्य प्रारंभ
नागपूर (Nagpur) : भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आदिवासी जनसंवाद यात्रा’च्या पूर्वतयारीसाठी नागपूर येथील रवी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. होळी यांनी यात्रेची रूपरेषा, उद्दिष्टे आणि नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजातील विविध समस्या समजून घेणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविणे, या दृष्टीने ही यात्रा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दि. १३ एप्रिल २०२६ पासून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथून या यात्रेची सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहोचवून आदिवासी समाजाशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. यात्रेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर भक्कम नियोजन करण्याचे आवाहन डॉ. होळी यांनी केले. कार्यकर्त्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत यात्रेसाठी सक्रिय भूमिका पार पाडण्याची तयारी दर्शवली.
या बैठकीस आकाश मडावी, रोहित कुमरे, ललित मडावी, अनिकेत कुमरे, सागर इवनाते यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, या बैठकीतून आगामी आदिवासी जनसंवाद यात्रेची मजबूत पायाभरणी झाल्याचे स्पष्ट झाले.
NandiVedh NEWS WEBSITE